ICC महिला टी२० विश्वचषक २०२३ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. केपटाऊनमध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र त्यांना निर्धारित षटकात आठ गडी गमावून १६७ धावाच करता आल्या. या पराभवामुळे टीम इंडियाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. आता अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंडशी होणार आहे.
टीम इंडिया या सामन्यामध्ये एक वेळ विजयाकडे वाटचाल करत होती, मात्र कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (५२ धावा) धावबाद झाल्यामुळे सामना पालटला. १५ व्या षटकात धाव घेण्याच्या प्रयत्नात हरमनप्रीत धावबाद झाली. तसे पाहिले तर हरमनप्रीत कौर खूप अनलकी राहिली आणि दुसरी धाव घेताना तिची बॅट अडकली ज्यामुळे ती क्रीजमध्ये पोहोचू शकली नाही. जेव्हा हरमनप्रीत खेळत होती तेव्हा भारताला ३३ चेंडूमध्ये ४१ धावा हव्या होत्या, पण तिचे बाद होणे टर्निंग पॉइंट ठरला.
हरमनप्रीत कौर धावबाद झाल्यानंतर चाहत्यांना टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीची आठवण झाली. २०१९ च्या विश्वचषक उपांत्य फेरीत धोनी न्यूझीलंडविरुद्ध धावबाद झाला होता. धोनी ५० धावांवर फालाज्दानी करत होता. तेव्हा मार्टिन गप्टिलने धोनीला धावबाद केले होते. धोनी धावबाद झाल्यानंतर भारताने हा सामना गमवला होता. अर्धशतक झळकावल्यानंतर हरमनप्रीतही धोनीप्रमाणे धावबाद झाल्याने भारतीय चाहत्यांचे स्वप्न भंगले.
माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने २०१९ मधील त्या घटनेचा फोटो शेअर करत लिहिले आहे, ‘क्रिजवर मॅच विनर आणि सेमीफायनलमध्ये रन आऊट. याआधीही आमची मनं तुटली आहेत. भारताला बाहेर जाताना पाहून वाईट वाटले. आम्ही सामना जिंकत होतो पण ऑस्ट्रेलियाने पुन्हा सिद्ध केले की त्यांना पराभूत करणे कठीण आहे. छान प्रयत्न मुली.
एमएस धोनी त्यावेळी उपांत्य फेरीच्या सामन्यात क्रीजवर पोहोचण्यास अवघा एक इंच कमी पडला होता. केपटाऊनमध्ये हरमनप्रीत आणि जेमिमाह रॉड्रिग्जप्रमाणेच धोनी-रवींद्र जडेजाने त्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खराब सुरुवात केल्यानंतर भारतीय डाव सावरला होता. तसे तर, न्यूझीलंडविरुद्धची ती खेळी एमएस धोनीसाठी शेवटची ठरली कारण त्याने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चार विकेट गमावत १७२ धावा केल्या. सलामीवीर बेथ मुनीने ३७ चेंडूत ५४ धावांची शानदार खेळी केली. आक्रमक फलंदाजीत माहिर असलेल्या अॅशले गार्डनरने १८ चेंडूत ३१ धावा केल्या, तर कर्णधार मेग लॅनिंगने ३४ चेंडूत ४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला आठ विकेट्सवर १६७ धावा करता आल्या. हरमनप्रीत कौरने ५२ आणि जेमिमा रॉड्रिग्जने ४३ धावा केल्या. अॅशले गार्डनरने गोलंदाजी करत दोन विकेट घेतल्या आणि ती सामनावीर ठरली.
View this post on Instagram